बुधवार, 10 मार्च 2010

संत चरित्रलेखनास महिपती यांनी जीवन अर्पण केले

बोवांचा जन्मच जणू संत चरित्रे लिहिण्यासाठीच झाला होता.
आपल्या ग्रंथलेखनाच्या अखेरच्या ओव्यातही त्यांनी संत चरित्र लिहिण्याची इच्छाच श्रीहरीजवळ प्रगट केली आहे.
ते लिहितात -
न लगे भुक्ति न लगे मुक्ती ।
मागत नाही धनसंपत्ती ।
तुझ्या दासांची वर्णीत कीर्ति ।
ऎसे श्रीपती करावे ॥ ५१-२२७
ते पुढे असेही लिहितात -
नावडेचि तुझे ब्रह्मज्ञान ।
न लगे तुझे योगसाधन ।
रूप दृष्टीसी पाहीण सगुण ।
यावीण मागणे आन नसे ॥५१-३३०
अशा प्रकारे संतांशी आणि संत चरित्रांशी बोवा पूर्णपणे एकरूप झाले होते व 'आपणा सारिखे करिती तात्काळ । नाही काळ वेळ तया लागी' असा संतांचा स्वभाव असल्याने त्यांच्याशी एकरूप झालेल्याला ते आपल्यासारखेच करून टाकतात ! अशा प्रकारे बोवाही संत संगतीने स्वतः संत बनले !
बोवांची भाषा, अमृताहुनि गोड आहे. त्यांनी वर्णन केलेले प्रसंग हृदयाला स्पर्शून जाणारे नि म्हणूनच जिवंत आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी लिहिलेले तुकोबांचे चरित्र पहा. सर्व चरित्रांत या तुकोबांचे चरित्रात बोवा जास्त रंगून गेले आहेत असे वाटते.
त्यांच्या सर्वच ग्रंथात दृष्टांत, उपमा यांचा वापर जागोजाग आढळतो. सुभाषितवजा वाक्ये तर किती दाखवावीत ?
परंतु या ग्रंथाचे खरे यश त्याच्या वाचकावर होणार्‍या परिणामात आहे. बोवांनी हा ग्रंथ वाचकांचे ईश्वरावरीक, संतांवरीक प्रेम वाढीस लागावे व ते सन्मार्गाला लागावेत, आपल्या मनुष्य जन्माचा हेतू कोणता याचा बोध त्यांना व्हावा यासाठी लिहिला आहे आणि हा ग्रंथ वाचल्यावर हा परिणाम वाचकांच्या मनावर निश्चित होतो यात तिळमात्र शंका नाही !
हा परिणाम साधण्याचे महत्त्वाचे कारण आम्हाला, असे वाटते की, 'आधी केले मग सांगितले' या म्हणीनुसार बोवांनी स्वतः अनेक सद् गुण अंगी बाणविले होते. अहिंसा, भूतदया, वसुधैव कुटुंबकत्व इ. दैवी गुण त्यांच्या ठायी पूर्णत्वाने वास करीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें